राजकीय मतभेदांमुळे देशाचा विकास खुंटला - डॉ. मनमोहन सिंग
राजकीय मतभेदांमुळे देशाचा विकास खुंटला असून त्याचा गंभीर परिणाम देशाच्या सुरक्षेवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करतानाच यातून मार्ग काढण्यासाठी भविष्यात आर्थिक विकासाच्या प्रश्नांना राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून पाहण्याची गरज आहे, ' असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले.
६६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान सिंग यांनी आज नवव्यांदा लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केले. परकी दहशतवाद, देशांतर्गत दंगली आदींचा परामर्श घेतानाच देशाच्या मंदावलेल्या आर्थिक प्रगतीवरही त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. 'जागतिक मंदीचा परिणाम देशाच्या अर्थ व्यवस्थेवर होतोय यात शंका नाही. मात्र त्यास आणखीही अनेक कारणे आहेत. आर्थिक विकासाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर देशात राजकीय एकमत होत नाही. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला मर्यादा येत आहेत. आर्थिक विकासाला पोषक वातावरण तयार होत नसल्यामुळे गुंतवणूकही घटत आहे. सरकारच्या आर्थिक क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. हे असेच सुरू राहिल्यास देशाच्या सुरक्षेवर याचा गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. त्यासाठीच या आर्थिक विकासाच्या मुद्द्याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहायला हवे, असे मनमोहन सिंग म्हणाले.
पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे :
* सरकारी व प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
* आसाममध्ये झालेल्या दंगलीच्या कारणांचा शोध घेतला जाईल व भविष्यात अशा घटना घडू नयेत याची काळजी घेतली जाईल.
* सध्या देश कठीण परिस्थितीतून जात असला तरी गेल्या आठ वर्षात अनेक क्षेत्रांत आपण बरीच प्रगती केली आहे. इतर क्षेत्रांतही अशी प्रगती गाठण्यावर भर दिला जाईल.
* गतवर्षी देशाच्या आर्थिक प्रगतीचा दर ६.५ टक्के होता. यंदा हा दर निश्चितच वाढेल.


No comments:
Post a Comment