आसामी नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरु करणार - आर.आर.पाटील
आसाम हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरवण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सचा गैरवापर कऱणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश गृहखात्याने दिले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना दिली.
राज्यातील आसामी विद्यार्थी तसेच नागरिकांना धमकावण्यासाठी काही समाजकंटक सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अशा काही सोशल साइट्सवर बंदी घालण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचेही आर.आर.आबांनी सांगितले आहे. आसामी नागरिकांनी धमक्यांना घाबरु नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर पोलिस यंत्रणा आसामी नागरिकांसाठी हेल्पलाईनही सुरु करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, हल्ल्याच्या भीतीने आसामी नागरिकांचे स्थलांतर अद्यापही सुरु आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसहून गुवाहाटी एक्सप्रेसमध्ये गुरुवारी तब्बल दीड हजार लोक आसामाकडे रवाना झाले आहेत. अफवांमुळे आसामी नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. असुरक्षिततेतच्या भावनेतून आसामींनी घराची वाट धरली आहे.


No comments:
Post a Comment