22 December 2013 http://jpnnews.webs.com
कल्याण - २०११-१२मध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात आलेल्या २१ सायकली कल्याण पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात धुळ खात पडून आहेत.
जिल्हा परिषदेच्या दप्तरदिरंगाईमुळे सायकली मंजूर झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची यादी समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात आली नाही. त्यामुळे या सायकली वाटपाविना पडून आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची पायपीट कमी होऊन त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कल्याण तालुक्यातील अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून सायकली मंजूर झाल्या होत्या.
मात्र समाजकल्याण विभागाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेले अंतराबाबतचे दाखले यांची पूर्तता न करताच स्थानिक नेत्यांच्या तोंडी आदेशाने या सायकली जिल्हा परिषदेने मंजूर केल्या होत्या. तसेच सायकली मंजूर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी समाज कल्याण विभागाच्या ६ जुलै २००९च्या पत्रानुसार जिल्हा स्तरावर पाठवण्यात आली नाही.
त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या सायकली पंचायती समितीच्या कार्यालयात धूळ खात पडून आहेत. या सायकली मार्च २०१३ अखेरीस खरेदी करण्यात आल्या. पण प्रस्तावाची पूर्तता न झाल्याने शैक्षणिक वर्ष संपत आले तरी प्रशासनाच्या बेजबाबदार वर्तनामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे.


No comments:
Post a Comment