2/1/2014 http://jpnnews.webs.com
मुंबई : मेट्रोच्या प्रत्येक डब्यावरील 'रिलायन्स मेट्रो' हा लोगो त्वरित काढून टाकण्याचा दुसरा आदेश एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिल्यावर आता तरी रिलायन्स कंपनीकडून आदेश ऐकण्यावाचून गत्यंतर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या ८ महिन्यांपासून रिलायन्सच्या या कृतीसाठी पाठपुरावा करीत असल्याचे अथक सेवा संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी स्पष्ट केले आहे. घाटकोपर-अंधेरी-वर्साेवा अशी मुंबईतील पहिली मेट्रो केव्हा सुरू होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांसह मुख्यमंत्र्यांनाही पडला होता. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १ मे रोजी मेट्रोची चाचणी पार पडली. त्या वेळेस मुंबईकरांच्या मेट्रोवर मालकी हक्क दाखवत बिनधास्तपणे रिलायन्स मेट्रोचे नाव दर्शवण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच अनिल गलगली यांनी २ मे २0१३ रोजी मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएकडे तक्रार करीत रिलायन्स मेट्रोचा लोगो हटविण्याची मागणी केली.
त्या वेळी महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी लोगो हटविण्याचे आदेश रिलायन्सला दिले. परंतु रिलायन्स कंपनीने त्या आदेशाला जुमानले नाही. ८ महिने उलटूनही कारवाई न झाल्यामुळे अनिल गलगली यांनी पुनश्च महानगर आयुक्त यांची भेट घेऊन याबाबत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर यू. पी. एस. मदान यांनी दुसर्यांदा आदेश काढले असून आता लोगो नाही हटवला तर रिलायन्स कंपनीवर दंडात्मक कारवाईसुद्धा होऊ शकते. आता गाड्यांवरील लोगो बरोबरच रेल्वे स्टेशनवरसुद्धा रिलायन्स मेट्रो असे नाव न कोरण्याची सक्त ताकीद मदान यांनी दिली आहे.


No comments:
Post a Comment