
मुंबई | जेपीएन न्यूज - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
महापालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये गढूळता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, पाणी निर्जंतुकीकरणासाठी पुरेशा प्रमाणात क्लोरीनचाही वापर केला जात आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून आणि उकळूनच वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या कार्यक्षेत्राला सात जलाशयांमधून दररोज पाणीपुरवठा केला जातो. या सर्व जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात सलग झालेल्या पावसामुळे नदीतून येणाऱ्या पाण्याची गढूळता वाढली आहे. त्यामुळे काही भागात पाण्याचा रंग बदलल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत.
गढूळ पाणी आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी आणि पिण्यासाठी पाणी गाळून व उकळूनच वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.


No comments:
Post a Comment