
मुंबई JPN NEWS - पावसाळ्यात घाट विभागात होणारी मातीची धूप, भूस्खलन आणि दगड-माती रुळांवर येण्याचा धोका कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने पर्यावरणपूरक उपाय म्हणून वेटिव्हर गवताचा वापर सुरू केला आहे.
भोर घाटातील कर्जत-लोणावळा आणि थळ घाटातील कसारा-इगतपुरी या संवेदनशील भागांमध्ये पावसाळ्यात मातीची धूप आणि उतार खचण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे रेल्वे रुळांची सुरक्षितता लक्षात घेऊन वेटिव्हर गवताच्या माध्यमातून उतार स्थिर करण्याचा प्रयोग करण्यात येत आहे.
दक्षिण-पूर्व घाट विभागातील ५,३०० चौरस मीटर क्षेत्रावर वेटिव्हर गवताची प्रायोगिक लागवड करण्यात आली आहे. खंडाळा-मंकी हिल परिसरात १,०५० चौरस मीटर, तर ठाकूरवाडी केबिन-पळसधरी विभागात ४,२५० चौरस मीटर क्षेत्रावर ही लागवड करण्यात आली आहे.
वेटिव्हर गवताची मुळे जमिनीत खोलवर वाढत असल्याने माती घट्ट धरून ठेवण्यास मदत होते. तसेच गवताचा दाट पर्णसंभार पावसाच्या पाण्याचा वेग कमी करून माती वाहून जाण्यापासून संरक्षण करतो.
या नैसर्गिक उपायामुळे मातीची धूप, उतार खचणे आणि दगड-माती रुळांवर येण्याच्या घटना कमी होण्याची अपेक्षा आहे. परिणामी पावसाळ्यात रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.
पारंपरिक अभियांत्रिकी उपायांसोबत अशा पर्यावरणपूरक उपायांचा वापर करून घाट विभागातील रेल्वे मार्ग अधिक सुरक्षित करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे.


No comments:
Post a Comment