
मुंबई JPN NEWS - नवसाला पावणारा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक मुंबईत दाखल होत आहेत. मात्र, याच दर्शनासाठी जळगावहून मुंबईत आलेल्या २५ वर्षीय जयदीप मेघराज नेमाडे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता ही घटना घडली.
जयदीप नेमाडे हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. यावेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात येते. परिस्थिती लक्षात येताच त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, जयदीप यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे अंतिम कारण वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठ्या रांगा लागत असून लालबाग परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.
याच गर्दीत जयदीप यांच्यासोबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जळगावहून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या तरुणाचा मुंबईत मृत्यू झाल्याने परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी जळगाव येथे जयदीप नेमाडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या काळात लाखोंच्या संख्येने मुंबईत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा आणि गर्दी व्यवस्थापनाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे.


No comments:
Post a Comment