
मुंबई JPN NEWS - गेटवे ऑफ इंडियापासून सुमारे १.५ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात फेरीबोट अचानक बंद पडल्याची घटना घडली. बोटीमध्ये ३४ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर असे एकूण ३८ जण होते.
गेटवे ऑफ इंडियाहून समुद्रात फेरफटका मारून परतत असलेली ‘अन्वरी’ फेरीबोट रात्री सुमारे ८.३० वाजता बंद पडली. याबाबतची माहिती कंट्रोल रूमला मिळताच पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
बीट क्रमांक १ चे पोलीस शिपाई अभिजित शिंदे आणि पोलीस नाईक गुरव यांनी जवळच्या बोटींची माहिती घेतली. यावेळी ‘आझाद हिंद’ फेरीबोट जवळ असल्याचे समोर आले. बोटीचे मालक जुनेद मुल्ला यांच्याशी संपर्क साधून आझाद हिंद बोट घटनास्थळी पाठविण्यात आली.
आझाद हिंद बोटीने घटनास्थळी पोहोचून बंद पडलेल्या अन्वरी फेरीबोटीला ओढत रात्री ९.१० वाजता गेटवे ऑफ इंडिया जेट्टी क्रमांक २ येथे सुखरूप आणले. बोटीवरील सर्व ३४ प्रवासी आणि चारही क्रू मेंबर सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली.


No comments:
Post a Comment